लातूर जिल्हा प्रतिनिधी:- मोहसीन खान
“मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : १०० किलोमीटर बोगदा प्रस्तावित.
तीन महिन्यात प्रकल्प व्यवहार्यता अहवाल देण्याचा निर्णय
पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे कृष्णेचे ४० टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आणण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येत आहे. दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून वाहून जाणारे हे पाणी १०० किलोमीटर बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. आणि त्यानंतर हे ४० टीएमसी पाणी बीड, धाराशिव, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांमध्ये वितरित केले जाणार आहे. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देऊ केले आहे..
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पुरस्थितींवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागांना जलसंपत्ती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत, कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीतून दरवर्षी वाहून जाणारे अंदाजे ४० टीएमसी पाणी १०० किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे पुराचे पाणी समुद्रात न जाऊ देता, त्याचा उपयोग दुष्काळग्रस्त भागांच्या सिंचनासाठी करणे आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्थेच्या ‘कृष्णा पुरनियंत्रण प्रकल्प’ अंतर्गत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाकडून ९६३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, आणि जलवाहिनी प्रणाली सुधारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, पुराचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये वळविण्याची योजना आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प’ बाबत महत्वाची बैठक पुणे येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयात सोमवार २ जून रोजी पार पडली. बैठकीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पुर परिस्थितीवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी हे अधिकचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेचे तांत्रिक सल्लागार या प्रकल्पाचा ‘प्रकल्प व्यवहार्यता अहवाल'(Feasibility Report) पुढी तीन महिन्याच्या आत सादर करणार आहेत.

यावेळी कृष्णा खोरे महामंडळचे कार्यकारी संचालक श्री.अतुल कपोले, सचिव वी.एम. कुलकर्णी, मुख्य अभियंता गुणाले, मुख्य अभियंता धुमाळ, उपसचिव सविता बोधेकर, अधीक्षक अभियंता शिल्पा जाधव (पाणी तंटा लवाद पुणे ), अधीक्षक अभियंता कोल्हापूर अभिजीत मेत्रे, कृष्णा मराठवाडा प्रकल्प अधीक्षक अभियंता थोरात, कार्यकारी अभियंता नाईक उपस्थित होते.
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे होणाऱ्या या प्रकल्पामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पुरस्थितींवर नियंत्रण करता येणार असून शेत जमिनीचे, पिकांचे व जीविताचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे, तर दुसरीकडे बीड, धाराशिव या दुष्काळग्रस्त भागांना ४० टीएमसी पाणी उपलब्ध होऊन लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेती उत्पादनात वाढ, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवून आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.


