विभाग प्रमुख. युसुफ पठाण
वर्धा जिल्ह्यातील प्रमुख गांधीवादी संस्थांनी भारतीय जनता पक्षाचे आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमीत वानखेडे यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. वर्ध्यातील गांधी संस्थांमध्ये माओवादी विचारधारेच्या लोकांचे येणे-जाणे असल्याचा गंभीर आरोप आमदार वानखेडे यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे गांधी विचारधारेवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर गांधी विचारांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आज दिनांक १६ जुलै २०२५ रोजी एक खुलं पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि या विधानाच्या पार्श्वभूमीवर काही ठोस प्रश्न उपस्थित केले आहेत.
“गैरजबाबदार आणि निराधार आरोप”
मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रामध्ये संस्थांनी नमूद केले आहे की, “माओवादी संबंधांच्या नावाखाली गांधीवादी संस्थांवर संशय घेणे हे केवळ निराधारच नव्हे, तर अपमानास्पदही आहे. अशा प्रकारच्या विधानांमुळे सत्यासाठी, अहिंसात्मक मार्गाने कार्य करणाऱ्या संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे.”
जनतेमध्ये संभ्रम आणि अविश्वास पसरवणारे विधान
“जर आमदार सुमीत वानखेडे यांच्याकडे किंवा राज्य शासनाकडे कोणतेही ठोस पुरावे आहेत, तर त्यांनी ते त्वरित जनतेसमोर आणावेत,” अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. “अन्यथा त्यांनी आपले विधान तात्काळ मागे घ्यावे.”
गांधी विचारांची स्पष्ट भूमिका
गांधी संस्थांनी पत्रात ठामपणे म्हटले आहे की, “आम्ही कालही हुकूमशाहीच्या विरोधात उभे होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसक किंवा टोकाच्या विचारांपासून दूर आहोत – मग ती डावी असो वा उजवी विचारसरणी.”
सत्यशोधनासाठी सहकार्याची तयारी
संस्थांनी पत्रात हेही स्पष्ट केलं आहे की, “कुठल्याही चौकशीस आम्ही पूर्ण सहकार्य करू. कारण आम्ही नेहमीच अहिंसा, सत्य आणि लोककल्याणाच्या मार्गावर चालत आलो आहोत. आमचं अस्तित्वच सत्ताधाऱ्यांना सतत अस्वस्थ करत असावं, अशी शंका येते.
या पत्रावर स्वाक्षरी केलेल्या प्रमुख गांधी विचार संस्थाचे प्रतिनिधी:
- चंदन पाल – अध्यक्ष, सर्व सेवा संघ, सेवाग्राम
- आशा बोथरा – अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान
- डॉ. प्रभाकर पुसदकर – मंत्री, नई तालीम समिती, सेवाग्राम
- डॉ. विभा गुप्ता – अध्यक्ष, मगन संग्रहालय, वर्धा
- अॅड. अविनाश काकडे – मंत्री, सर्व सेवा संघ, सेवाग्राम
- अनिल फरसोले – मंत्री, गांधी सेवा संघ, सेवाग्राम
- रमेश दाने – अध्यक्ष, प्रदेश सर्वोदय मंडळ, महाराष्ट्र
- अतुल शर्मा – सदस्य, ग्राम सेवा मंडळ, वर्धा
- सुदाम पवार – अध्यक्ष, किसान अधिकार अभियान, वर्धा
- डॉ. तारक काटे – अध्यक्ष, धरमित्र, गोपुरी वर्धा
- अशोक बंग अध्यक्ष चेतना विकास
- किरण जाजू सहमंत्री जमनालाल बजाज बालमंदीर
- चिन्मय फुटाणे सचिव ग्राम सेवा मंडळ वर्धा
- डॉ हेमचंद्र वैद्य प्रधानमंत्री राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा

