कोल्हापूर (प्रतिनिधी): किशोर जासूद
“महिला सुरक्षा ही केवळ पोलिस यंत्रणेची नव्हे तर प्रत्येक सामाजिक घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून महिलांसाठी सुरक्षित, जागरूक आणि सहानुभूतीपूर्ण सामाजिक वातावरण निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे.”असे प्रतिपादन करवीर तालुक्याचे संरक्षण अधिकारी श्री. विनायक चौगुले यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले ते
महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील समाजशास्त्र विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला व बालसुरक्षा जागरूकता अभियान’ अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात सहाय्यक संरक्षण अधिकारी सौ. रानिता चौगुले, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रमुख सौ. निलम धनवडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. महेंद्र कांबळे यांनीही महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध, आणि महिलांसाठी उपलब्ध सरकारी यंत्रणा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. गोमटेश्वर पाटील हे होते. त्यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना म्हटले की, “समाजातील महिलांच्या समस्या समजून घेण्यासाठी विद्यार्थिनींनी अभ्यास, चर्चा आणि संशोधनाची दिशा घ्यावी.”
या उपक्रमाचे आयोजन डॉ. अंकुश गोंडगे, कॅप्टन उमेश वांगदरे, डॉ. संदीप पाटील आणि प्रा. स्नेहल घोरपडे यांनी प्राचार्य डॉ. गोमटेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
कार्यक्रमास डॉ. शरद गायकवाड, डॉ. संजय ओमासे, महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


