बुलडाणा जिल्हा (प्रतिनिधी) :- सुनील वर्मा
आज देशात २१ लाखांहून अधिक खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे ज्यात २.५१ लाखांहून अधिक स्ट्रीट फूड विक्रेते आहेत. देशभरातील सुमारे ९० लाख बचत गटांशी (SHG) संबंधित १० कोटींहून अधिक महिलांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सक्षम आणि जागरूक करण्याच काम केल्या जात आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रमार्फत येथील सहकार विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात ‘संकल्प स्वच्छ आहार’ उपक्रमांतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय अन्न सुरक्षा आणि – मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्राच्या संचालक प्रिती चौधरी, दिल्ली मुख्यालयाचे संचालक डॉ. रविंद्र सिंग, आयुष विभागाचे प्रा. डॉ. योगेश शिंदे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे सहायक संचालक ज्योती हरणे, स. संचालक अजय खैरनार, निलेश धंदाळे, शुभांगी निकम आदी उपस्थित होते. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्याला धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. या ठिकाणाला अनेक देशी व विदेशी पर्यटक भेटी देतात. त्यांना स्थानिक खाद्यपदार्थांचे मोठे आकर्षण असते. त्यामुळे या खाद्यपदार्थांची मोठी मागणी होत असून स्थानिकांना त्याचा लाम होतो. पर्यटक अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रत्येक विक्रेत्यांनी स्वच्छता, सुरक्षतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. प्रशिक्षणामध्ये सांगितलेल्या बाबींचा आपल्या व्यवसायात अवलंब करून अन्न सुरक्षा मानकाचे पालन करावे. जिल्ह्यातील अनेक खाद्यपदार्थांचे नावलौकीक असून शेगांव कचोरीप्रमाणे नवनवीन प्रयोगातून पदार्थांची ब्रँडींग करावी. खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. स्वनिधी योजनाच्या माध्यमातून अल्प दरात कर्ज उपलब्ध करुन दिला जातो. या योजनेचा लाभ घेऊन खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपला व्यवसाय मोठा करावा, त्यांनी खाद्यपदार्थ तयार करण्यापर्यंत सिमीत न राहता त्यांचे पॅकींग, मार्केटींग व ब्रेडींगवर भर द्यावा. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाव्दारे देशभरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम राबवित आहे. या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील सर्व बचत गट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी लाभ घेऊन ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करुन द्यावे. जंक फुडमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिक पौष्टिक व सात्वीक आहाराला प्राधान्य देत असून केंद्र शासनही आयुष आहाराला प्रोत्साहन देत आहे.

आयुष आहारामुळे विविध आजारांपासून बचाव होत असून शारीरिक, मानसिक स्वास्थासाठी आवश्यक आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेते व बचत गटांनी आयुष आहाराला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी केले. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भारतामध्ये अन्न सुरक्षा आणि निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगीतले ङ्गरस्त्यावरील खाद्य पदार्थ हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत उदाहरण असून प्रत्येक वर्गातील व्यक्ती आवडीने खातात. खाद्यप्रेमी अन्न सुरक्षा, स्वच्छता व पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.


