पुणे विभाग : सचिन दगडे पुणे : खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर, पूर, वरूडे, वाफगाव तसेच शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ परिसरातील गावे अवर्षणग्रस्त असून कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित असल्याने शासनाच्या माध्यमातून पाणीप्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली.अनेक वर्षे पाणी प्रश्नी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे, उद्योजक रमेश दौंडकर यांनी नागपूर येथे त्यांची भेट घेऊन पाणीप्रश्नी पुढाकार घेण्याची मागणी केली. मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे गाव केंदूर असून माहेर जिंतूर आहे. मार्च 2022 मधील अर्थसंकल्पीय अधिवशनातही कळमोडी योजनेबाबत त्यांनी टाव्हरे यांच्या पाठपुराव्यानुसार तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.डिंभे, चासकमान, कळमोडी धरणसाठ्यांच्या फेरसर्वेक्षणाबाबत डिसेंबर 2023 मधील नागपूर येथील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे, उद्योजक रमेश दौंडकर यांच्याशी पाणी प्रश्नी चर्चा करताना राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी निश्चितच शिरूर व खेड तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.डिंभे, चासकमान व कळमोडी या धरणांचे पाणीवाटप, नागरीकरणांमुळे कमी झालेले सिंचनक्षेत्र याचे फेरसर्वेक्षण करून त्याआधारे शिल्लक राहु शकणारे पाणी शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ परिसरातील गावांना उपलब्ध करण्यासंर्भात शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करू तसेच खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावे कळमोडी योजनेच्या अतिरिक्त सिंचन क्षेत्रात जलसंपदा विभागाने समाविष्ट केल्याची माहिती टाव्हरे यांनी दिल्यानंतर त्यासाठीही सहकार्य करण्याची हमी मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली.मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अशोकराव टाव्हरे व उद्योजक रमेश दौंडकर यांनी साकोरे- बोर्डीकर यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून निश्चितच पाणीप्रश्न मार्गी लागेल असेल असे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.


